केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या वतीने जिल्ह्यात कृषीतंत्रज्ञानाची जनजागृती गावोगावी करण्यासाठी विकसित कृषी संकल्प अभियान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ-१, कृषी विभाग आत्मा, यवतमाळ, अक्शन फॉर फूड प्रोडक्शन (अफ्रो), यवतमाळ, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र, नागपूर व ईफको यांचे संयुक्त विद्यमाने दि. २९ मे २०२५ पासून ते १२ जून २०२५ या १५ दिवसांच्या कालावधीत कृषीतंत्रज्ञानाची जनजागृती तसेच नवीन पिक प्रकार आणि शासकीय योजनांची माहिती तसेच मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या यवतमाळ, कळंब, बाभूळगाव, राळेगाव, घाटंजी, मारेगाव, वणी, केळापूर, झरी – जामनी या ९ तालुक्यातील प्रत्येक दिवशी प्रत्येक तालुक्यातील तीन गावांमध्ये जावून विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात आला.
विकसित कृषी संकल्प अभियान २०२५ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ-१, कृषी विभाग आत्मा, यवतमाळ, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र, नागपूर, अक्शन फॉर फूड प्रोडक्शन (अफ्रो), यवतमाळ व ईफको यांचे शास्त्रज्ञ, अधिकारी यांनी शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधून खरीप पूर्व पिक नियोजन, खरीप हंगामासाठी माती परीक्षण, योग्य बीज प्रक्रिया करून पेरणी करण्याचे महत्त्व, रुंद वरंबा सरी पद्धत, कापूस पिकामध्ये अति सघन लागवड पद्धत, तण व्यवस्थापन, फवारणी दरम्यान घ्यावयाची काळजी, रोग व कीड व्यवस्थापन व कृषी विभागाच्या सर्व शासकीय योजना या विषयी मार्गदर्शन व माहिती देण्यात आली.
या १५ दिवसीय अभियाना अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या यवतमाळ, कळंब, बाभूळगाव, राळेगाव, घाटंजी, मारेगाव, वणी, केळापूर, झरी – जामनी या ९ तालुक्यात रोज दोन फिरत्या कृषी रथांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांशी थेट संपर्क साधून कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात आला.
खरीप हंगामाच्या मुहूर्तावर या अभियानामुळे शेतकरी बांधवांना चांगले मार्गदर्शन लाभले. यामुळे शेतकरी बांधव प्रोत्साहित होवून या अभियानास चांगला प्रतिसाद लाभला असे दिसून आले.